परळी वैजनाथ, प्रतिनिधी…. शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा पंढरपूर आषाढी वारी निमित्त निघणारा पालखी सोहळा दरवर्षी परळीत येतो. या दोन दिवसात परळीचे वातावरण अतिशय भक्तीमय असते.परंतु या भक्तीत भेद निर्माण होण्याची चिन्हे यावर्षी दिसून येत आहेत.यावर्षीपासुन दारात येणाऱ्या पालखीला भाविक मुकणार असे चित्र दिसत आहे.संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग बदलण्याचा घाट रचला जात असुन याबाबत परळीकर भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.याबाबत पालखी मार्ग पुर्ववत राहण्यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले आहे. परळीत येणाऱ्या सर्वच दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात. एवढी धार्मिक व जाज्वल्य परंपरा मोडीत निघण्याची शक्यता आहे.त्यामुळे आपलं शहर -आपली परंपरा जपण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे बनले आहे. याबाबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून संत गजानन महाराज पालखीचा परळीतील नगर प्रदक्षिणा मार्ग पुर्ववत राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.संत गजानन महाराज संस्थानला याविषयी सविस्तर भुमिका व आग्रही मागणी करण्यात येणार आहे.राणी लक्ष्मीबाई टॉवर- गणेश पार रोड -गणेशपार- नांदूरवेस- मार्गे नेहरू चौक- संत जगमित्र नागा मंदिर अशा प्रकारची नगरप्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा मार्गक्रमण करतो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही धार्मिक परंपरा बनलेली आहे. दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे परळी शहरात जोरदार स्वागत होते. हीच परंपरा पुर्ववत कायम राहण्यासाठी भाविक भक्तांसह प्रयत्न करणार असल्याचे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले आहे.