देशात १६ मे नंतर करोनाचा एकही रुग्ण आढळणार नाही ? – वैद्यकीय व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सद्यस्थितीत भारतातील ‘कोव्हिड १९’च्या रुग्णांमध्ये रोज लक्षणीय वाढ होत असली, तरी १६ मेनंतर देशात एकही करोनाचा रुग्ण आढळणार नाही, असा दावा नीती आयोगाचे सदस्य आणि सरकारच्या वैद्यकीय व्यवस्थापन समितीचे प्रमुख व्ही.के.पाल यांनी एका अभ्यासाद्वारे मांडले आहे. देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने करोनाच्या संसर्गाचा वेग मंदावला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण कमी झाले असून, ते आता दहा दिवसांवर गेले आहे. त्यामुळे सध्या जरी देशात रुग्णसंख्या वाढत असली, तरी १६ मेनंतर भारतात ‘कोव्हिड १९’चा रुग्ण आढळणार नाही, असा निष्कर्ष या अभ्यासाद्वारे मांडण्यात आला आहे. पॉल यांनी नुकतेच त्याचे सादरीकरण केले. राष्ट्रीय साथरोगशास्त्र संस्थेच्या संशोधकांसह जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) काही प्रतिनिधींनी मांडलेल्या अभ्यासाद्वारे हा निष्कर्ष समोर आला आहे. यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.