सायबर भामट्यांपासून सावधान – महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई : सध्याच्या काळात सायबर भामटे लोकांना फसविण्यासाठी अनेक युक्त्यांचा वापर करीत असून त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

मोबाईलवर एक एसएमएस या भामट्यांकडून पाठविला जातो, त्यात तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक झाले असून मेसेज मधील नंबरवर कॉल करून तुमची माहिती अपडेट करा, किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करून तुमची माहिती अपडेट करा. तुम्ही माहिती दिलीत तर त्याची खात्री करण्यासाठी येणारा ओटीपी पण मागितला जातो व तुमच्या खात्यामधील पैसे अनोळखी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातात . या सर्व संभाषणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे भामटे कधीही सर्व संभाषणात तुमच्या बँकेचे नाव घेत नाहीत . तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे अशा स्वरूपाचे हे एसएमएस असतात.

अशा स्वरूपाच्या फसव्या एसएमएसपासून सावध राहा, त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा फोन करू नका असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. कुठलीही बँक कोणत्याही खातेदाराची वैयक्तिक माहिती जसे कि सीव्हीव्ही क्रमांक ,पिन क्रमांक फोनवर विचारणार नाहीत,तसेच ओटीपी कन्फर्म करण्यासाठी कॉल करणार नाहीत . जर तुम्हाला असा फोन आला व पलिकडील व्यक्ती त्या संभाषणामध्ये तुमच्या बँकेचे नाव घेत नसेल तर तो फेक कॉल असण्याची शक्यता जास्त आहे .तुम्ही जर एखाद्या अशा प्रकारच्या गुन्ह्यात फसविले गेले असाल तर कृपया न घाबरता त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये करा आणि www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर देखील त्याची नोंद करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *