रुग्ण वाढल्यास जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध, नागरिकांना नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन ; जिल्हाधिकारी रविंद्र जगताप !

बीड :- सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये कोविड -19 च्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल -3 निर्बंध लागू आहेत. सदरील निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणाऱ्या आस्थापना दैनंदिन सुरू असल्याने जिल्ह्यातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून दैनंदिन प्राप्त होणाऱ्या दैनिक अहवालावरून असे निदर्शनास येते की, जिल्ह्यामध्ये दि.10/06/2021 रोजी 168 रुग्ण, दि.11/06/2021 रोजी 130 रुग्ण, दि.12/06/2021 रोजी 180 रुग्ण, दि.13/06/2021 रोजी 108 रुग्ण व दि.15/06/2021 रोजी 154 कोविड रुग्ण आढळून आलेले आहेत.

          सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता असल्या कारणाने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक ‘कोविड योग्य वर्तन’ ( Covid Appropriate Behaviour) चे पालन करत नसून बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने, शासकीय कार्यालयांमध्ये समुहांमध्ये गर्दी करत असल्याने, आवश्यकता नसताना रस्त्यावर समुहांमध्ये उभे राहणे, मास्कचा वापर न करता बाहेर फिरणे इत्यादी कारणांमुळे रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

          सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर (Social Distancing), सॅनिटायझर चा व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असून यामुळे भविष्यात पुन:श्च कडक निर्बंधाचे वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सबब जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे, शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, सर्व आस्थापना धारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर (Social Distancing), सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे, सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समूहामध्ये वावर टाळावा, रेस्टॉरंट, हॉटेल या  केवळ पन्नास टक्के उपस्थितीमध्ये निर्देशित केलेल्या वेळेत चालू ठेवण्यात याव्यात. अन्यथा संबंधित रेस्टॉरंट, हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

          यापुढे रुग्ण संख्या वाढीचा आलेख वाढत राहिल्यास, नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल तसेच कोविड-19 विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शासन नियमाप्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सर्व व्यापारी वर्गांनी निर्देशित केलेल्या वेळेत दुकाने उघडावी तसेच संध्याकाळी 5.00 नंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच (वैद्यकीय कारणास्तव) घराबाहेर पडावे. संध्याकाळी 5.00 वाजेनंतर  संचारबंदी लागू आहे याचे देखील सर्व नागरिकांनी भान ठेवावे. रुग्ण वाढीचा दर (Positivity Rate) वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर-3 (level-3 ) मधून स्तर-4 (level-4) चार मध्ये गेल्यास सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बंधांना सामोरे जावे लागेल याची नोंद सर्वांनीच घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *