बिडी कामगार व मजूरांना बालाजी संस्थांन कडून मदतीचा हात..!
जालना : लॉकडाऊन च्या संकटाने रोजगार गमावलेल्या बिडी कामगार व मजूर यांच्या समोर जगण्याची भ्रांत पडली होती. अशा स्थितीत धार्मिक ते सोबत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या बालाजी संस्थान चे अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश जल्लेवार यांनी स्वखर्चाने मदतीचा हात पुढे करत संस्थान मार्फत गरजवंतांना सोशल डिस्टन्स चे पालन करून घरपोच किराणा साहित्याचे वाटप सुरू केले असून सामाजिक दायित्वातून कर्तव्याची भुमिका घेतली असल्याचे गणेश जल्लेवार यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रविवारी ( ता. २६) मदत वाटप मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. नवीन जालना भागातील बालाजी नगर परिसरात असलेल्या बालाजी संस्थान चे अध्यक्ष गणेश जल्लेवार यांनी जेव्हा संकटकालीन परिस्थिती निर्माण होते. तेव्हा स्वतः पुढाकार घेऊन गोर- गरीब व गरजवंतांना आधार दिला आहे. गतवर्षी पाणी टंचाई काळात मोफत टँकरने पाणी पुरवठा केला. शिवाय दरवर्षी डेंग्यु आजारास प्रतिबंध करण्यासाठी जंतुनाशक फवारणी केली जाते. यंदा ही मलेरिया दिनी सदर फवारणी करण्यात आली असून सध्या उद्भवलेल्या परिस्थितीत परिसरातील बिडी कामगार व मजूरांच्या ३०० कुटुंबांना किराणा साहित्य असलेल्या किट वाटप करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्स चे तंतोतंत पालन करून स्वयंसेवकामार्फत घरपोच वाटप केल्या जात आहेत.या पुढे स्वखर्चाने परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी मोहीम करणार असल्याचे गणेश जल्लेवार यांनी सांगितले. दरम्यान शासन, प्रशासन, कोरोना योध्दे यांच्या अथक परिश्रमांमुळे जिल्हा कोरोना मुक्त होत असला तरी नागरिकांनी घरातच थांबावे व अत्यंत तातडीचे काम असेल तर मास्क लावून सोशल डिस्टन्स चे पालन करावे असे आवाहनही गणेश जल्लेवार यांनी केले.