नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !!

बीड : नागरीकांनी पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी व खबरदारी (नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा) नागरीकांनी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूर आपत्तीपासून स्वतःचा बचाव करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे

राज्यात तसेच जिल्ह्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, पाझर तलाव, साठवण तलाव ई.तील काही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत व काही भरण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे नद्यांना पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावांतील नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाप्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत.

पुरस्थिती मध्ये काय करावे यासाठी उपाययोजना

१) गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
२) गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे.
३) गावात/ घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
४) पूर स्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवा.घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा.
५) कुटुंबातील सर्व व्यक्तीकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या.
६) पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा
प्रयत्न करा.पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा.
७) मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष
क्र.०२४४२-२२२६०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
८) आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना सुरक्षित स्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा.
९) सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इ.संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा.हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील यासाठी प्लास्टीकच्या पिशव्या सोबत ठेवाव्या.
काय करू नये:
१) पूर असलेल्या भागात, नदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका.
२) पूराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पूर आल्या नंतर पूलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका.
३) दूषित/ उघड्यावरील अन्न पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.)
४) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत् तारांना स्पर्श करू नका.
५) पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका.
6) जलसाठ्याजवळ/ नदी जवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर/ नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये.
7) मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *