कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असलेल्या शहरात लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी – गृहमंत्री
नागपूर, (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना लॉकडाऊन आणखी वाढण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले.
गृहमंत्री देशमुख यांनी म्हटलं आहे की, राज्याचा गृहमंत्री म्हणून मी पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत सहभागी होतो. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र ज्या शहरांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत, तिथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र जी शहरं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, तिथे काही प्रमाणात सूट मिळू शकते, असं अनिल देशमुख म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबद्दल घोषणा करतील, असंही अनिल देशमुख म्हणाले.