आष्टी तालुक्यात वीजग्राहकांनी थकवले महावितरणचे १३ कोटी ७० लाख रुपये!

आष्टी : तालुक्यातील नियमितपणे वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांमुळे महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्यातच लॉकडाऊनचे निमित्त झाल्याने थोडीथोडकी नव्हे तर महावितरणची वीज ग्राहकांकडे तब्बल १३ कोटी ७० लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकीत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांनी थकबाकी भरावी असे आवाहन आष्टीचे उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी केले आहे. आष्टी तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक व वाणिज्य ग्राहकांनी विज बील न भरल्याने थकबाकीचा आकडा प्रचंड वाढत चालला आहे. लॉकडाऊन काळात राज्य सरकारने कोणत्याही ग्राहकाची वीज खंडित न करण्याचे आदेश दिल्याने थकबाकी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आष्टी तालुक्यात स्वतःहून पैसे भरणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण फारच कमी आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा व दिवाबत्ती योजना यांचे वीज बिल भरण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र दिलेले आहे. प्रत्येक महिन्याला वीज ग्राहकांकडून दीड कोटी रुपयांची आष्टी महावितरणची मागणी असते. त्यापैकी दर महिन्याला फक्त ७० ते ८० लाखरुपये वसूली होते. संबंधित वायरमन तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांद्वारे थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकांना वीज भरण्यासाठी फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून वीजबिल भरा असे आवाहन करत आहेत. आष्टी तालुक्यातील थकीत वीज ग्राहकांनी आपले वीजबिल भरावे असे आवाहन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *