आपल्या गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्यासाठी एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. ११ मेपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे. मुंबई पुणे येथे अडकलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी सोमवार ११ मेपासून एसटी सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरात, गावात अडकलेल्या लोकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. गावी जाण्यासाठी एसटी बसेसचं बुकिंग सुरू होणार असल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. तसेच गावी जाण्याचा हा संपूर्ण प्रवास हा मोफत असणार आहे. बुकिंग करण्यासाठी महत्वाचे मुद्दे
२२ जणांचे ग्रुप बुकिंग किंवा वैयक्तिक बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी २२ जणांची यादी सादर करून प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. शहरी भागात ही परवानगी पोलीसांकडून दिली जाईल तर ग्रामीण भागात ही परवानगी तहसिलदार कार्यालयाकडून दिली जाईल.
२२ जणांच्या ग्रुपला परवानगी मिळाली की सदर परवानगी पत्र विभागीय नियंत्रकाकडे सादर करून बसची मागणी करायची आहे. ही बस तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जाईल.
वैयक्तिक प्रवाशांनी MSRDC च्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करायचं आहे. बुकिंग करताना परवानगी पत्र अपलोड करायचं आहे. एसटी बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटचा स्टॉपला थांबेल.